---Advertisement---

मंठ्यातील बँकांत महिनाभरापासून कॅश टंचाई! लग्नसराई अन् खरीप हंगामात नागरिक हैराण; एटीएम मशीनही पडली थंड

JALNA NEWS TODAY LOCAL INSIGHTS
April 28, 2026 2:46 PM
मंठ्यातील बँकांत महिनाभरापासून कॅश टंचाई! लग्नसराई अन् खरीप हंगामात नागरिक हैराण; एटीएम मशीनही पडली थंड Jalna News Mantha
---Advertisement---
Jalna News WhatsApp Channel Follow

मंठा (जालना): “आपलाच पैसा आपल्याला मिळत नाही” अशी संतप्त भावना सध्या मंठा तालुक्यातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. गेल्या महिनाभरापासून मंठ्यातील बँकांमध्ये रोख रकमेचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे सामान्य नागरिक, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. Jalna News विश्वातून समोर आलेल्या या माहितीनुसार, दररोज केवळ ४ ते ५ लाखांचा पुरवठा होत असल्याने बँकांच्या दारात लांबच लांब रांगा लागत आहेत.

नेमकी अडचण काय?

मंठा तालुका आणि परिसरातील बँकांमध्ये रोख रकमेची तीव्र टंचाई जाणवत आहे. महिनाभरापासून ही स्थिती असल्याने नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहूनही रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू असून घरगुती समारंभ आणि देण्या-घेण्यासाठी रोख रकमेची मोठी गरज भासत आहे. मात्र, बँकांकडे मागणीच्या तुलनेत नगण्य पुरवठा असल्याने लोकांचे नियोजन कोलमडले आहे.

शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी सध्या शेती मशागतीची कामे, रासायनिक खते आणि बियाणे खरेदीच्या तयारीत आहेत. या सर्व व्यवहारांसाठी ग्रामीण भागात आजही रोख रकमेवरच भर दिला जातो. मात्र, बँकांतील ठणठणाटामुळे शेतीची कामे रखडण्याची भीती निर्माण झाली आहे. डिजिटल व्यवहारांची सुविधा सर्वत्र उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील नागरिक अधिक अडचणीत सापडले आहेत.

एटीएम मशीन बंद आणि संशयाचे वातावरण

मंठ्यातील बहुतांश एटीएम मशीन एकतर बंद आहेत किंवा त्यात कॅश उपलब्ध नाही. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान, निवडणुका असलेल्या राज्यांकडे रोख रकमेचा पुरवठा वळवण्यात आल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असली तरी अधिकृत स्तरावर याला दुजोरा मिळालेला नाही.

“आमची रोज ४० ते ५० लाखांची मागणी असते. परंतु, गेल्या महिनाभरापासून केवळ ४ ते ५ लाख कॅश मिळत आहे. यामुळे खातेदारांना त्यांचाच पैसा देताना अडचणी येत आहेत.”
— श्रीधर सरकटे, बँक व्यवस्थापक, जिल्हा मध्यवर्ती बँक, मंठा.

बँक कर्मचारीही दहशतीत

रोख रक्कम उपलब्ध नसल्यामुळे बँक व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना खातेदारांच्या संतापाला सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी शाब्दिक चकमकी आणि वादाचे प्रसंग घडत असल्याने बँक कर्मचारीही सध्या प्रचंड तणावात काम करत असल्याचे चित्र दिसत आहे.

परिस्थिती कधी सुधारणार?

एककीडे लग्नसराई आणि दुसरीकडे शेतीचा हंगाम यामुळे नागरिक दुहेरी संकटात सापडले आहेत. प्रशासनाने तातडीने मंठ्यातील बँकांना पुरेसा रोख पुरवठा न केल्यास नागरिकांचा संयम सुटण्याची शक्यता आहे. डिजिटल इंडियाच्या काळातही रोख रकमेअभावी होणारी ही परवड जालन्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक आहे.

JALNA NEWS TODAY LOCAL INSIGHTS

Jalna News

Jalna News Team provides accurate and timely updates on News, Government Schemes, Career opportunities, Crime, Finance, Agriculture, Business, Health, Entertainment, and Travel across Maharashtra. Our mission is to deliver reliable, easy-to-understand information that keeps readers informed and empowered.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now