परतूर (जालना): शिक्षणाला ‘पवित्र मंदिर’ मानले जाते, मात्र जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील एका घटनेने शिक्षण क्षेत्राला काळीमा फासला आहे. दैठणा बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एका शिक्षकाने चिमुकल्या विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, मारहाणीच्या दहशतीमुळे विद्यार्थी शाळेत जाण्यास घाबरत आहेत.
अभ्यासाचे कारण आणि बेदम मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक राजकुमार जाधव यांनी इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या ऋषिकेश कणसे आणि हर्षवर्धन रेपे या दोन विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. केवळ ‘अभ्यास केला नाही’ या कारणावरून या शिक्षकाने आपला संयम गमावला आणि चिमुकल्यांना मारले.
अंगावर उमटले जखमांचे व्रण
ही मारहाण इतकी अमानुष होती की, विद्यार्थ्यांच्या पाठीवर आणि हातावर जखमांचे मोठे व्रण उमटले आहेत. घरी परतल्यावर मुलांच्या अंगावरील खुणा पाहून पालकांना मोठा धक्का बसला. शिक्षकाच्या अशा वागणुकीमुळे पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परतूरचे गटशिक्षणाधिकारी डॉ. भरत वानखेडे यांनी तात्काळ दैठणा बुद्रुक येथील शाळेला भेट दिली. त्यांनी पीडित विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधून प्रकरणाची सविस्तर चौकशी केली आहे. या चौकशीनंतर दोषी शिक्षकावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










