जालना प्रसूतीदरम्यान मृत्यूची धक्कादायक बातमी समोर आली आहे… जालना शहरातील शासकीय महिला रुग्णालयात प्रसूतीदरम्यान 20 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मृत महिलेचे नाव कोमल चव्हाण असे असून ती सिंदखेड राजा तालुका मधील हनवतखेड गावची रहिवासी होती.
जालना रुग्णालयात नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, कोमल चव्हाण यांना काल सकाळी सुमारे 11 वाजता जालना जिल्हा स्त्री रुग्णालय येथे प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्यांची नॉर्मल डिलिव्हरी यशस्वीरीत्या पार पडली आणि त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला.
प्रसूतीनंतर मृत्यूचे कारण काय?
मात्र, डिलिव्हरीनंतर काही वेळातच महिलेचा अचानक अतिरक्तस्त्राव (Postpartum Hemorrhage) सुरू झाला. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. शस्त्रक्रिया करून काही प्रमाणात रक्तस्त्राव थांबवण्यात यश आले होते, तरीही महिलेची प्रकृती गंभीरच राहिली.
खासगी रुग्णालयात हलवताना जालना प्रसूतीदरम्यान मृत्यू: Jalna delivery death news
सायंकाळी साडेचारच्या सुमारास महिलेची प्रकृती अधिक चिंताजनक झाल्याने तिला उच्चस्तरीय उपचारासाठी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, नातेवाईकांच्या इच्छेनुसार तिला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.
तेथे तज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू करण्यात आले, मात्र उपचारादरम्यानच कोमल चव्हाण यांचा मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
नातेवाईकांचा आक्रोश, कारवाईची मागणी
घटनेनंतर जिल्हा रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आणि एकच आक्रोश सुरू झाला. संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप करत निष्काळजीपणाचा ठपका ठेवला.
“योग्य वेळी योग्य उपचार मिळाले असते, तर आमच्या मुलीचा जीव वाचला असता,” असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
डॉक्टरांचे स्पष्टीकरण
या प्रकरणी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गवारे यांनी सांगितले की, डिलिव्हरी यशस्वी झाली होती, मात्र त्यानंतर अचानक अतिरक्तस्त्राव सुरू झाला. आवश्यक त्या सर्व उपचारांसह शस्त्रक्रिया करण्यात आली होती. रक्तस्त्राव नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न झाला, परंतु रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर होती. पुढील उपचारासाठी हायर सेंटरला हलवण्याची तयारी सुरू असतानाच नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला.
आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
या दुर्दैवी घटनेमुळे जिल्ह्यातील आरोग्य सुविधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रसूतीसारख्या संवेदनशील प्रक्रियेदरम्यान अशी घटना घडल्याने प्रशासनाने याची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अवघ्या २० व्या वर्षी कोमल यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जन्मलेल्या मुलीच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.











